अहिल्यानगर, दि. १९
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक *१९ ते २३ सप्टेंबर २०२५* रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात वीजांचा कडकडाट, जोरदार वारे व मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नद्यांच्या विसर्गात वाढ; पूरस्थितीचा धोका
पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढला असून त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.
सध्या भिमा नदीवर दौंड पूल येथे १२,३५० क्युसेक, गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून ४७६९ क्युसेक, प्रवरा नदीवरील निळवंडे धरणातून ७०० क्युसेक, ओझर बंधारा १,११५ क्युसेक, मुळा धरणातून १०,००० क्युसेक, घोड धरणातून ७००० क्युसेक, सीना धरणातून १,६२८ क्युसेक, कुकडी नदीवरील येडगांव धरणातून ७५० क्युसेक, हंगा नदीवरील विसापूर धरणातून ३५० क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे.